Home » » अण्णांचे राजकारण! (संपादकीय)

अण्णांचे राजकारण! (संपादकीय)

Written By Aurangabadlive on शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२ | १२:१८ PM

भारतीय राजकारणाचे सरासरी वय काय, असा प्रश्न आपल्यापुढे आला की त्याचे उत्तर आतापर्यंत ७० ते ८० असं दिले जात असे. आता हे वय कशावरून काढतात, हेही कळायला हवं. तर देशाच्या पंतप्रधानांपासून तळागाळाच्या राजकारणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कार्यरत असलेले नेते आणि कार्यकर्ते यांच्या वयाच्या सरासरीवरून हे वय निश्चित केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत आपल्या देशातील नेतेमंडळींच्या वयाची सरासरी खाली आली आहे. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शीख दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी पंतप्रधान झाले. त्यावेळी राजीव गांधी यांचे वय अवघ्या ४७ वर्षांचे होते. आपल्या देशाचे ते आजवरचे सर्वांत तरुण पंतप्रधान ठरले. अर्थात, त्यानंतर पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी इतका तरुण व्यक्ती पुन्हा बसू शकला नाही. असे असले तरी केंद्रीय मंत्री मात्र कमी वयाचे झाले आहेत. अनेक खासदार आणि आमदारही खूप कमी वयाचे पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतही अनेक जण वयाच्या चाळीशीच्या आत आमदार झाले आहेत. काही दोन दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळीही पंतप्रधान डॉ. मनमोहन qसग यांनी तरुणांना अधिकाधिक संधी देऊन आपल्या मंत्रिमंडळाचा चेहरा तरुण करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आपल्या देशाच्या राजकीय क्षेत्रातील तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या काही वर्षांपासून तरुणांना राजकारणामध्ये ‘प्रमोटङ्क करण्याचे धोरण अंगिकारले आहे. देशाच्या राजकाणाचा चेहरा तरुण होणे, हा त्याचाच परिपाक मानला जातो. सध्या देशभरात घोटाळ्यांचा बोलबाला आहे. त्यामुळे राजकारण्यांबद्दल आणि देशाच्या राजकारभाराचा गावगाडा चालविणाèया नेत्यांबद्दल जनतेच्या मनात चिड आहे. त्यातही विशेषत: तरुण पिढी राजकारणाबद्दल संधी मिळेल तिथे चीड व्यक्त करून दाखविते आहे. राजकारणाशी संबंधित कोणतीही घडामोड घडली की सोशल नेटवर्किंग साईटसवर तरुणांच्या राजकारणाबद्दलच्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहिल्या की त्याची प्रचिती येते. एकीकडे अशी परिस्थिती असताना देशातील सर्वच क्षेत्रांतील भ्रष्टाचाराविरोधात जनआंदोलन पुकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मात्र अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला नाऊमेद करणारे वक्तव्य करीत आहेत. केजरीवाल यांना सत्तेचा हव्यास सुटला आहे, असे अण्णांनी काल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अण्णा म्हणतात त्याप्रमाणे केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यापासून त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा वाढल्या असतीलही. पण त्या का वाढायला नकोत? आपल्या देशात केवळ निवडून येऊन भागत नाही. सत्ता हाती आल्याशिवाय तुम्हाला हवे ते धोरण राबविता येत नाही, हे खरेच आहे. केवळ सत्ताधाèयांविरोधात आंदोलने करून तुम्हाला अपेक्षित असलेली उत्तरे मिळतात, असे घडत नसते. गेल्या दीड वर्षांपासून अण्णा हजारे लोकपाल विधेयकासाठी आंदोलन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी उपोषणेही केली. दिल्लीत सुरू झालेल्या अण्णांच्या आंदोलनाला देशभरातील जनतेने साथ दिली. दुसरा स्वातंत्र्य लढा अशा अर्थाने अण्णांच्या आंदोलनाकडे पाहिले गेले. पण शेवटी अण्णांच्या पदरात काय पडले? केंद्र सरकार अजूनही लोकपाल विधेयक संसदेत पारित करू शकलेली नाही. अण्णांनी आंदोलन सुरू केले की सरकारी पातळीवर हालचाली सुरू होतात. मग अण्णांना आश्वासन दिले जाते आणि अण्णा उपोषण मागे घेतात, असेच चित्र काही दिवसांत दिसून आले. प्रत्यक्षात ना लोकपाल विधेयक मंजूर होते ना बाकी काही. अशा वेळी अरqवद केजरीवालसारखा कार्यकर्ता राजकारणाच्या माध्यमातून जनतेच्या पदरात काही पडावे, यासाठी प्रयत्न करीत असेल तर त्याचे काय चुकते? सध्या कोणताही राजकीय पक्ष भ्रष्टाचारमुक्त राहिलेला नाही. केजरीवाल यांनी विविध पक्षांच्या नेत्यांच्या कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणून ते दाखवूनही दिले आहे. अशावेळी केजरीवाल स्वत:चा पक्ष स्थापन करून राजकीय क्षेत्रातील हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनतेत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांना त्यांचेच गुरु राहिलेल्या अण्णासारख्या व्यक्तीने नाऊमेद करणे कितपत योग्य आहे? एकीकडे देशातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणाविषयी तरुणांच्या मनात चिड आहे, या राजकारणाकडे तरुणवर्ग वळायला तयार नाही, अशी परिस्थिती असताना ज्यांच्याकडे तरुणवर्ग मोठ्या अपेक्षेने पहात आहे, त्याच अण्णांनी तरुण मंडळी नाराज होतील, असे वक्तव्य करणे नक्कीच योग्य नाही. अण्णांना भ्रष्टाचाराचा डंश झालेला नाही, त्यांचे व्यक्तिमत्त्व निष्कलंक आहे. अण्णांनी केलेल्या आंदोलनामुळे हा व्यक्ती आपल्यासाठी निश्चित काहीतरी करू शकेल, अशी अपेक्षा त्यांच्याबद्दल तरुणवर्गात निर्माण झालेली आहे. तेच अण्णा आज केजरीवाल यांना सत्तेचा हव्यास वाटतो आहे, असे म्हणत जणू देशातील तरुणांनी राजकारणात पडूच नये, असाच सल्ला तरुणाईला देत आहेत. केजरीवाल यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकलेले असले तरी अजून त्यांचा पक्ष प्रत्यक्षात मैदानात यायचा आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचे नावही अजून ठरलेले नाही. असे असताना त्यांना राजकीय हव्यास सुटला आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे. देशातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राजकारणाचा आणि त्याचे मूळ असलेल्या भ्रष्टाचाररूपी राक्षसाचा समूळ नायनाट करण्याचे काम तरुणाईच करू शकते, असा विश्वास सर्वांनाच वाटत आहे. तसाच तो अण्णांनाही वाटतो. अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत पहिले आंदोलन केले; त्यावेळी त्यांनी एका छोट्या मुलीच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडले होते. अण्णांच्या त्या लढ्यात त्यांना साथ देणारे सर्वाधिक तरुणच होते. या तरुणांपुढे बोलताना अण्णांनी आता तुम्हीच देशाचा कारभार हातात घ्या. विधायक कामांसाठी पुढे या, राजकारणात उतरा, असा सल्ला दिला होता. मात्र, एकीकडे तरुणांनो चांगल्या कामांसाठी राजकारणात या, अशी हाक द्यायची आणि दुसरीकडे राजकारणात उतरले की बघा, त्यांच्या राजकीय आकांक्षा कशा उंचावत आहेत, असे म्हणायचे. अण्णांसारख्यांकडून अशा दुतोंडी भूमिकेची अपेक्षा नक्कीच नव्हती. राजकारणात आले की प्रत्येकालाच सत्तेच्या गादीवर बसावे, देशाचा गावगाडा हाकलण्याचे काम आपल्या हाती यावे, असे वाटणे चूक नाही. अण्णांपासून बाजूला जात वेगळी चूल मांडून राजकीय पक्ष स्थापणाèया केजरीवाल यांना तसेच वाटले, तर चूक नाही. मात्र, केजरीवालसारख्यांबद्दल असे बोलून अण्णा स्वत:च तरुणाईला नाऊमेद करणारे राजकारण खेळताहेत असेच एकंदरीत वाटत आहे.
Share this article :
 
: NOTICE : AURANGABAD NEWS LIVE Marathi online newspaper with latest and breaking news from all aurangabad dist and marathwada. ::DISCLAIMER :: - We have taken every care to see that copyrighted material (content or images) is not included in this website. Still if there is any such inclusion of copyrighted material by accident or by mistake, the concerned authorized copyright holders may intimate at abdnewslive@gmail.com On receipt of which we assure that we would remove that material if it is proved to be breach of copyright.